TOD Marathi

नवी दिल्ली | औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. गेल्या आठवडय़ात खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन प्रकाश आंबेडकर यांनी फुले वाहिली होती. त्यानंतर भाजप व शिवसेना-शिंदे गटाने आंबेडकरांवर तीव्र टीका केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रकाश आंबेडकर यांनी अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली होती. या वादावर सोमवारी पडदा टाकत आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये होणारी दंगल माझ्यामुळे थांबल्याचा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये नसली तरी त्यांनी शिवसेना-ठाकरे गटाशी युती केली आहे.

हेही वाचा” …सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार”

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे फितूर आणि त्यांच्या हत्येचा सल्ला देणारे हे दोघे हिंदू होते, त्यांचा निषेध केला जात नाही. मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने खरा इतिहास पुढे आणला गेला. प्राध्यापक जैमिनी कडू यांनी लिहिलेल्या पुस्तकातील तपशील वाचला तर वास्तव कळेल. इथल्या जयचंदांनीच या देशाला गुलाम केले. इतिहास जसाच्या तसा स्वीकारला पाहिजे, कुठल्या तरी पक्षाला भूमिका सोयीची वाटते म्हणून इतिहासाचा गैरवापर करू नये, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.